श्रीक्षेत्र पीठापुर

आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्हा, येथील पिठापूर हे ठिकाण श्री श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज, यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिध्द आहे. या त्यांच्या जन्मस्थानी प्रभुनी आपल्या अनेक बाळलीलाने सर्वाना चकित केले. याचे वर्णन ‘श्रीपाद वल्लभ चरित्रामृत’ या ग्रंथात केले आहे. या ठीकाणी त्यांच्या मूळ पादुकांचे मंदिर असून, त्याशिवाय कुकुटेश्वर मंदिर, अनघा लक्ष्मी मंदिर, सत्यनारायण मंदिर अशी विविध जागृत स्थाने आहेत.

आंध्र प्रदेशात ‘पीठापूर’ गावी एक आपळराजा नावाचा आपस्तंब शाखेचा ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता भार्या सुमति नित्य अतिथि-पूजा करीत असे. एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्रीदत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले. ब्राह्मण भोजन झाले नव्हते. त्यावेळी आपळाराजा घरी नव्हते. त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. भगवान् श्रीदत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे. त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली. ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षहीन, पादहीन आहेत. कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे? मला तुमच्यासारखा ज्ञानवंत, ईश्वरासमान पुत्र व्हावा. हे ऐकून श्रीदत्त-महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले “तुला कुलभूषण, तपस्वी, कीर्तीमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करील.” हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्यात श्रीदत्त महाराज अदृश्य झाले. तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला. तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्रीदत्त-स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत.

या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरू असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. सात वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक चारही वेद, मीमांसा इ. म्हणू लागला. तो १६ वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ, धर्म आचार इ. शिकवत असे. १६ वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले. पण पुत्राने पूर्ण नाकारले, उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली. माता – पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरूष आहे. तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले. पुत्रानेदेखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधु जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशिर्वाद दिला संततीयुक्त, दीर्घायुषी, मातृ-पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल. वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल. आपल्या आई-वडिलांना श्रीदत्त-स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पीठापूर सोडले. हेच पीठापूर श्रीपाद-श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त-महाराज भिक्षेस येतात. तसेच पादगया हे ठिकाणही श्रीक्षेत्र पीठापूर येथे आहे. तेथील मंदिरासमोरच्या तीर्थ कुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. या क्षेत्रामध्ये स्वत: भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रुपामध्ये आहेत. हे एक शक्तीपीठ आहे.

भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे. सन १३२० साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पल्लराजु शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. साधारणत सन १९८३ साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन १९८५ साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली.

सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.

श्री क्षेत्र पिठापूर, जन्मस्थान मंदिर

या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्ती आहेत. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत. तेथील दृश्य फार आनंदीदायक व शांतीदायक असे आहे.

मंदीर पहाटे ५.०० वाजता उघडते व साधारणत सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरूवात केली जाते. दुपारी साधारणत एक ते चारच्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदीर बंद केले जाते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदीराभोवती केल्या जातात. यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लीत व आनंदीदायक असते. यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिध्द मंगल गायली जातात. या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मुर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर, दिव्य, मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदीर लहान असल्यामुळे सध्यातरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळच केली जाते. सधारणत रात्री ९.०० वाजता मंदीर बंद होते.

श्री दत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. येथे भक्तांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्यापैकी नित्यसेवा, पालखी सेवा, बिल्वार्चना, तुळशीपत्र व ब्राह्मण भोजन इत्यादी.

पीठापुर हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजु शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रध्दाभावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये अध्याय ६ पान क्र. ३८ येथे सांगितले आहे की, श्री अप्पलराजु शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्नीशमन दत्तात्रेयांच्या लहान मुर्तीतून श्रीदत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजुंच्या समोर बसून बोलत असत व श्रीदत्तप्रभु परत त्या लहान मुर्तीमध्ये विलीन होत असत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृता मध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पीठापूर हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्याप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडीसुध्दा जागा शिल्लक राहणार नाही. हे श्रीपादांचे वाक्य काळ्या दगडावर मारलेल्या रेघेप्रमाणे आहे.

श्री कुकुटेश्वर मंदिर, पीठापूर

पुरातन काळात दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञात सर्व देवतांना (यक्ष गरूड, गंधर्व, किंपुरुषम, महर्षी, विष्णू, ब्रह्मदेव) आमंत्रित केले होते. भगवान शंकरांना या यज्ञा साठी आमंत्रण न दिल्यामुळे त्याची पत्नी सतीदेवी (दक्ष राजाची कन्या) या यज्ञानिमित आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तेथे सतीदेवीने भगवान शंकरांना का निमंत्रण दिले नाही याची विचारणा केली असताना दक्षप्रजापतींने भगवानांची अवहेलना केली व त्यामुळे सतीदेवीला अतीव दुःख झाले. त्यावेळी दक्ष यज्ञात सतीदेवी आमंत्रण नासताही गेली व सतीने योगग्निने देहत्याग केला. भगवान शंकराने तो देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव करू लागले. व भगवान विष्णूनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड-खंड केले. सतीदेवीच्या शरीराचे भाग अन्य-अन्य ठिकाणी पडले त्यातील पाठीचा एक भाग पिठापुरला पडल्यामुळे त्या ठिकाणास ‘फुर हुत्तिका शक्ती पीठ‘ असे म्हणतात. पूर्वीचे नाव पीठिकापूर व आता पिठापूर असे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात “श्री पीठिकापूर माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पीठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म, कर्म हे अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे.

स्थान माहात्म्य

श्रीपादांची बहीण विद्याधारी, राधा व सुरेखा यांचा विवाह पिठापूर येथे झाला. त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापूरात सवित्रकाठकचयन यज्ञ केला. काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे. ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते. पीठापुरला खास पौराणिक महत्त्व आहे.

पीठापूर हे पूर्वकाळापासूनच सिद्धक्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की, सुर्योदय होईपर्यंत उठायचे नाही, मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासुर सकाळ झाली समजून उठला. भगवंतानी त्याचा उद्धार केला ते कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापूरात आहे. याच परिसरात कालाग्नीशमन दत्तमंदिर आहे. काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते. हे दत्तमंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते. ह्या परिसरातील स्पंदने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अस्तित्त्वाची ग्वाही देतात.

श्री दत्त पादुका, पीठापूर

श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे. येथे अभिषेक लघुरुद्र करुन आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी ७ वाजता पालखी सेवा असते. स्नान करुन सोवळे घालून आपणास पादूकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. संस्थान तर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे. मंदिरातून सोडून जाताना डोळे अक्षरश: पाणावतात. व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्र्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात.

पादगया क्षेत्र पिठापूर

या स्थानाची वैशिष्ट्ये

१. श्रीपाद श्रीवल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केला.
२. कुक्कुटेश्वर कालाग्नीशमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत.
३. श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याचठिकाणी घडल्या.
४.  श्रीपादश्रीवल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत.
५. त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली.
६. श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनच भक्त पिठापूरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातील असे हे सिद्धस्थान.
७. चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरितामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील.
८. येथे आलेल्या सर्वांची बाधा पिडा निरसन होऊन ते सुखी होतात.
९. रक्षाबंधन दिवशी जे भक्त पिठापूरी वास्तव्य करुन श्रीपाद श्रीवल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील. त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्रीवल्लभ घेतील.

श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान

हे श्रोते हो! श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिव स्वरूप आहेत. ते पीठिकापुरम् गावी अंतर्धान पावून काशी नगरीत अवतरीत होत आणि गंगेचे स्नान करीत. त्यांच्या पीठिकापुरम् मध्ये अवतरीत होण्याने तेथील भूत पिशाच्च बाधेचे निर्मूलन झाले होते. पीठिकापुरम् मधील त्यांच्या जन्म स्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती. भविष्यात, कांही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल. तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करील. तेथील जन समुदाय पीठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील. ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न कळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो. प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द, स्पर्श रूप, रस, गंध या तत्त्वांनी बनलेले असते. योग दृष्टीने पहाता ज्या शरीरात पृथ्वीतत्त्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करूणा भावामुळे पीठिकापुरम् या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात. यावर मी प्रश्न केला ”आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृती मुळे पीठिकापुरमला भौतीक रूपाने येतात का?”

सुवर्ण पीठिकापुर महिमा

श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले ”तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पीठिकापुरम् मध्ये एक सुवर्ण पीठिकापूर आहे. जितकी भौतिक पीठापुरमची व्याप्ति आहे तेवढीच सुवर्ण पीठिकापुरची सीमा आहे. सुवर्ण पीठिकापुर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. वास्तविक पहाता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पीठिकापुरात वास्तव्य करीत असल्या सारखे वाटते. या सुवर्ण पीठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी, तपस्वी, महापुरुष या सुवर्ण पीठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात. परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पीठिकापुर केवळ योग चक्षु, ज्ञान चक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते.”

या क्षेत्री कसे पोहोचायचे (गुगल नकाशा)

  • हैद्राबाद, विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते.
  • तिथे उतरून रिक्षा अथवा बसने (१० किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर या क्षेत्राला जाता येते.
  • या ठिकाणी जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वेआहेत. शिर्डी, विशाखापट्टनम, काकिनाडा एक्सप्रेसया रेल्वे गाडया मराठवाडयातून पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.
  • पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई-भुवनेश्वर (कोणार्क एक्सप्रेस), तर विदर्भातील लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा-पुरी एक्सप्रेस ह्या रेल्वे गाडया सोयीच्या आहेत.
  • या ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.

पीठापूर परिसरातील या स्थानी अवश्य दर्शन घ्या 

) कुंतीमाधव मंदिर पूर्वजन्मीचा ब्राह्मण असलेल्या राक्षसाचा वध इंद्राने केला. त्याचे प्रायश्चित्ता दाखल ब्रह्मदेवाने पाच माधव मंदिर बांधण्यास सांगितले. संपूर्ण भारत देशात 
१) काशी येथे बिंदू-माधव, 
२) प्रयाग येथे वेणी-माधव, 
३) रामेश्वर येथे सेतू-माधव, 
४) त्रिवेंद्रम येथे सुंदर-माधव, व 
५) पीठापूर येथे कुंती-माधव मंदिर आहे. त्यास दक्षिण काशी असेही म्हणतात.

) श्रीदत्त अनघालक्ष्मी मंदिर – पीठापूर शहरापासून ३किमी अंतरावर श्रीदत्त अनघालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर भव्य व सुंदर असून या ठिकाणी परवानगी घेऊन नामस्मरण करता येते. भाविकांना अनघाष्टमीचे व्रत व पूजा करता येते. सकाळी व दुपारी पूजा होते.

) अंतरवेदी मंदिर – पीठापूर पासून ८० कि. मी. अंतरावर वसिष्ठ नदीजवळ श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी यांचे १५ व्या शतकातील प्राचीन कालीन मंदिर आहे. तेथे ब्रह्मा – विष्णू – महेश स्वरुपात त्रिमूर्ती आहेत.

) बिकोवोल मंदिर – काकीनाडा पासून ३५ कि. मी. अंतरावर भगवान शंकरांचे ९ व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे.

) द्राक्षारामम मंदिर – काकीनाडा पासुन २५ कि. मी. अंतरावर भिमेश्वरा स्वामी मंदिर आहे. हे प्राचीन कालीन मंदिर १० व्या शतकातील आहे. तसेच तेथे ‘मणिक्यंबा’ हे एक प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे. (शक्तीपीठ)

) गोदावरी पुष्करम (राजमुंद्री) – राजमुंद्री जवळ पुष्कराम तिर्थ आहे. गोदावरी पुष्करम १२ वर्षामध्ये एकदा येथच असतो. राजमुंद्री येथे बरीच वर्षे श्री मार्कण्डेय ऋषींचा वास होता. त्यांनी ग्रंथाचे लेखन येथेच केले. तेथे भव्य मार्कण्डेय मंदिर आहे. तेथे अर्ध कुंभमेळा भरतो. गोदावरी नदीमध्ये स्नानास तेथे महत्व आहे. तसेच गोदावरी नदी पार करुन दुसर्‍या बाजूस ” कोटीलिंगेश्वर” हे १० व्या शतकामध्ये बांधलेले प्राचीन कालीन मंदिर आहे.

) मंदापल्ली – राजमुंद्री येथून २८ कि. मी. अंतरावर व काकीनाडा येथून ४० कि. मी. अंतरावर भगवान शंकराचे मंदिर आहे. त्या मंदिरास “मंडेश्वर स्वामी” मंदिर असे म्हणतात. तेथे ‘तेलाभिषेक’ होतो.

) रयाली – राजमुंद्री पासुन ३५ कि. मी. अंतरावर असलेले व वशिष्ठ व गौतमी नदीच्या मध्ये वसलेले हे ” जगम मोहिनी केशव स्वामी मंदिर” आहे. तेथे भगवान विष्णू व मोहिनी यांची काळ्या दगडा मधील प्राचीन मूर्ती असून ते एक महत्त्वाचे क्षेत्र आहे.

९)  क्षेत्र अन्नावरम – पीठापूर येथून ३२ कि. मी. अंतरावर असलेले ” श्री सत्यनारायण मंदिर”. श्री क्षेत्र अन्नावरम येथे “श्री वीरा व्यंकटा सत्यनारायण स्वामी” यांचे मुख्य मंदिर आहे. हे मंदिर डोंगरावर वसलेले आहे. या डोंगराला  “रत्नागिरी डोंगर” असे म्हणतात. जवळच श्रीराम, वनदुर्गा व कनकदुर्गा यांचीही मंदिरे आहेत. मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे व पूर्ण व्यवस्था आहे. चेन्नई – हावडा रेल्वे लाईनवर अन्नावरम आहे. रेल्वे स्टेशनपासून अन्नावरम मंदिर ३ कि. मी. अंतरावर आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचे व जगप्रसिद्ध मंदिर मानले जाते. मंदीर दुमजली असुन तळमजल्यावर  “त्रिपाद विभूती नारायण” यंत्र असून वरच्या मजल्यावर देवांच्या मूर्ती आहेत. हे  “त्रिपाद विभूती नारायण उपनिषद” यंत्र अथर्ववेदांमधील एक भाग  आहे.